Friday, February 12, 2010

रायरेश्वर कॅपिंग

नच्याला सांगितलेल्या तंबूचे भारतात आगमन झाले होते आणि तो तंबू आमच्या माळ्यावरून आता मला वाकूल्या दाखवत होता. तेव्हा तंबूला बाहेरचा रस्ता दाखवावा असा विचार मनात रेंगाळत होताच. अम्या आणि नाशिक समोर हा विचार बोलुन दाखवताच.."चला पुढच्याच शनीवारी....." अशी आरोळी कॅफ़े गूडलकमधे घुमली. मग लगेचच मक्याला कॉल केला आणि तोपण लगेच येतो असं म्हणाला. सामानाची यादी तयार झाली, कोणी काय-काय घ्यायचं ठरलं आणि मग शनीवार येण्याची वाट पाहू लागलो. सर्वानूमते रायरेश्वरच्या पठारावर मुक्काम करावे असं ठरलं, तंबूमधे रहायची पहीलीच वेळ असल्याने आम्ही सगळेच खूप उत्साहात होतो आणि त्यामूळे - दिवसांवर असलेला शनीवार आम्हाला फ़ार लांबचा वाटू लागला होता.

शेवटी शनीवार आला, मक्या प्रगतीने शिवाजीनगरला वाजता अवतरला, मी त्याला पिकअप केले आणि आम्ही माझ्या घरी गेलो, घरी जाता-जाता भरपेट नाश्ता केला. घरी जाऊन सॅक पॅक केल्या. रायरेश्वर तासांवर होते आणि पायऱ्यांपर्यंत बाईक्स जात असल्याने आम्ही - ला निघायचे ठरवले होते, त्यामूळे तसे निवांत होतो. .३० ला अम्या आणि नाशिकचा कॉल आला आणि आम्ही घरातून बाहेर पडलो. ट्रेक करायचा नव्हता त्यामूळे दमायचा काही प्रश्न नव्हता त्यामूळे तसे सगळे खूश होते :) सिंहगडरोडच्या कात्रज बायपासच्या इथे सगळे भेटलो आणि मग पुढचा प्रवास सुरु झाला. बाईक्स भन्नाट स्पीडने पळवत आम्ही हायवेवरून जात होतो,मग भोर फ़ाट्याला वळालो, भोरला पोचून मग रायरी गावाचा रस्ता विचारून घेतल. भोर ते रायरी रस्ता तसा छान आहे, छोटा आहे, पण दोन्ही बाजूंनी हिरवीगार शेते होती त्यामूळे मस्त वाटत होते. दुरवर रोहिडा किल्ला दिसत होता, रस्ता विचारत विचारत आम्ही रायरी ह्या पायथ्याच्या गावी पोचलो. तिथेच एका हातपंपावर सोबत आणलेल्या मोठ्या वॉटरबॅगमधे पाणी भरून घेतले कारण आम्हाला तंबूमधे तेच वापरायचे होते ना...मग तिथेच एका गावकऱ्याकडून पुढचा रस्ता विचारून घेतला.

रस्ता कसला!!! ट्रकच्या टायरमूळे माती दबली जाऊन पायवाटेसारखं काहीतरी होता, सोबतीला भरपूर छोटे दगड-धोंडेपण होते. रायरी गावातून वाईला उतरणारा रस्त्याचे काम सुरु होते, आणि ते सुद्धा अगदी पहील्या टप्प्यात होते, फ़क्त तात्पुरता ट्रक जाईल अशी जागा मोकळी केलेली होती, आणि पावसाळी मोऱ्या बांधून झाल्या होत्या. रस्त्याच्या कडेला भरपूर दगड आणून टाकले होते, काही ठिकाणी मजूर दगडी फोडायचे काम करत होते. हा रस्ता बराच फ़िरत फ़िरत जातो आणि मुळात रस्ता फ़क्त नावालाच असल्याने हायवेवर ९० ने पळणारी बाईक इथे १० च्या स्पीडलासुद्धा स्पर्श करत नव्हती. बाईक आणि आमचे सांधे खिळखिळीत होण्याची वेळ आली होती, खूप वेळ झाली तरीही रायरेश्वराचा डोंगर काही दिसत नव्हता, त्यामूळे "आयला रस्ता चुकलो का काय??" असेही मनात येउन गेले पणा दुसरा रस्ता तसाही नसल्याने आम्ही बाईक्स पुढे डामतट होतो. शेवटी जरा वेळाने एका सपाटीवरून परिचित असे रेलिंग आणि पायऱ्या दिसु लागल्या आणि आम्ही हुश्श केले. वाटेत - घरे आणि थोडी शेतीपण दिसली : तसेच एक पाईपपण रस्त्याच्या बाजूने जात होता. शेवटी आम्ही एक वळणावर पोचलो, तेथुन उतरणारा रस्ता सातारा जिल्ह्यात उतरत होता आणि रायरेश्वराचे पठार डावीकडे होते.

पायऱ्या आणि आमच्यामधे जेमेतेम १००-२०० मिटरचे अंतर राहीले होते पण त्या पायऱ्यांपर्यंत जायला रस्ताच नव्हता :) तर मधे एक उंचवटा होता आणि त्यावरून बाईक जाउ शकेल ह्याची शाश्वती नव्हती. उंचवटयावर दगड होते आणि मुरुम होता त्यामुळे तिथे चालतानाच सरकायला होत होतं. परंतु रात्री अश्या वैराण ठिकाणी बाईकला एकटीला सोडून जाणे काही पटत नव्हते. शेवटी मनाचा हिय्या करून बाईक चढवून पाहू असे सर्वानुमते ठरले. मग मी माझ्या बाईकवर स्वार झालो, मक्या दगड घेउन बाईकमागे उभा राहीला, अम्या तितक्यात "अरे थांबा विडियो काढू.." असे म्हणत कॅमेरा दगडावर सेट करून बाईकच्या मागे राहीला आणि नाशिक लेगगार्डपाशी उभा राहीला. जय बजरंगबली असा गजर करून मी फ़र्स्ट गिअर टाकला आणि हळूहळू क्लच सोडू लागलो, मक्याने दगड मागच्या चाकामागे ठेवल्याने त्या दगडाला रेटा देउन बाईक पुढे सरकली. पुढुन नाशिकने लेग-गार्ड धरलेले होते आणि मागून अम्या बाईकला धरून उभा होता. दगड चुकवत, मुरुमावरून थोडे सरकत शेवटी माझ्या बाईकला वर नेण्यात यश आले आणि आम्ही सगळ्यांनी एकच जल्लोष केला :) परंतु दुसरी बाईक चढवण्याआधी मी पायऱ्यापर्यंत व्यवस्थित पोचता येइल हे बघण्यासाठी बाईकने पायऱ्यांना स्पर्श करून आलो. मग परत कसरत करत नाशिकची बाईकसुद्धा वर आणली.
तंबूची बेस्ट जागा...
पायऱ्यांपासून रायरेश्वराचे पठार चढून जाऊन १००-२०० मिटरवर असेल. पायऱ्यांच्या इथेच तंबूसाठी अगदी मस्त जागा होती, एक छान झाड होते आणि त्याभोवती मस्त मोकळी जागा होती. तरीही वर चांगली जागा बघण्यासाठी मक्या आणि नाशिक पायऱ्या चढून गेले आणि मी, अम्या लाकडे गोळा करायच्या महत्वाच्या कामगिरीवर लागलो. एव्हड्यात माझे लक्ष मागे गेले आणि मे ओरडलो "आइला........", अमितपण मागे वळून ओरडला आनि आम्ही दोघांनी कॅमेरे काढून निरोप देणाऱ्या सुर्यनारायणाचे आणि त्यांच्या चित्रकलेचे फोटो काढू लागलो, नाशिकने पण पायऱ्यावरून ते पाहीले आणि आम्हाला शेलक्या शिव्या हासडत त्यानेपण - फोटो काढून घेतले. नाशिकच्या म्हणण्यानुसार वर जागा होती पण आम्ही दोघांनी बरीच लाकडे जमा केली होती आणि आम्हाला पायऱ्या चढायचा कंटाळा आला होता : म्हणून आम्ही "नको खालीच तंबू टाकू" असे जाहीर करत परत लाकडे गोळा करायला सुरुवात केली. आम्ही चौघांनी मिळून तंबू उभारला, बाजूने खिळे ठोकोन तो मजबूतपणे जमीनीला अडकवला. वारे चांगलेच सुटले होते, आणि मस्त गारेगार होते. जरा अंधार पडायच्या आत तंबूमधे दिवा लावणे, कपडे बदलणे इत्यादी कामे आम्ही आटपून घेतले.

सुर्यास्ताचे काही फोटोज..


लाकडे जमा करतानाच अम्याचे "चला शेकोटी...चला आता शेकोटी" असे सुरु होते, त्यामूळे -.३०ला आम्ही शेकोटीसाठी जागा ठरवून लाकडे जवळ रचून ठेवली. तीन दगड जमा केली, ती रचून त्यामधे वाळलेले गवत, पेपर अणि लाकडाचे छोटे तुकडे जमा केले आणि दोन बूचं रॉकेल टाकून काडी लावली, बघता बघता शेकोटी सर्व बाजूने अगदी छान पेटली. वारं प्रचंड असल्याने लाकडे अगदी धडा-धडा जळत होती पण आम्हाला काळजी नव्हती कारण आम्ही प्रंचड लाकडं जमा केली होती. वारं चांगलच गार होतं त्यामूळे शेकोटीपासून जरा दूर गेलं तरी थंडी भरत होती, त्या धडाडत्या शेकोटीजवळ गप्पा मारत बसलो, अम्याने माउथ ऑरगन काढून काही गाणी वाजवली. अंधार पडला तसा पायऱ्यांवरील सौर दिवे पण लागले त्यामूळे आजूबाजूला जरा प्रकाश पडू लागला. आकाशात चंद्र नसल्याने चांदण्याचा अगदी मस्त सडा पडला होता. -.३० वाजल्यावर आम्ही स्टोवची जोडा-जोडी करून त्याला रेडी करून ठेवले, मग संदिप शेकोटीमधे बटाटे भाजत थांबला आणि आम्ही कांदे, टोमेटोची कत्तल करायला सुरुवात केली आणि सगळी कत्तल उरकून भुर्जी तयार करण्यासाठी सज्ज झालो.

स्टोव पेटवला आणि लक्षात आलं की हे काही इतकं सोप्प नाही, वारं वेगात वाहत होतं आणि कोणत्याही दिशेने वाहत होतं, स्टोव काही नीट राहायला तयार नव्हता, मग सगळ्यांच्या सॅक वापरून स्टोवला कवर केलं मग कुठे साहेब व्यवस्थित सुरु झाले.कांदा-मिरचि आणि दालचिनी टाकून मी भुर्जी करायला सुरुवात केली, एकिकडे गप्पा-टप्पा सुरु होत्याच, दोनदा आखी भुर्जी पडता-पडता वाचली : कांदा मस्त परतल्यावर अंडी फ़ोडून मी कढईमधून टिपीकल टन-टन असा आवाज करत मस्त मसालेदार भुर्जी तयार केली. सगळं व्यवस्थित मांडून सगळे भुर्जीवर ताव मारू लागलो. मक्या आणि अंड्यांचा पहीलाच सामना असल्याने मी जरा साशंक होतो, पण त्याला भुर्जी आवडली आणि माझा जीव भांड्यात पडला (भुर्जीच्या नाही.. :)). पोटभर भुर्जी खाऊन आणि सगळं आवरून आम्ही शेकोटीपाशी गप्पा मारत बसलो. एकिकडे बटाटे आणि कांदे भाजून खात होतो, अम्याचा माउथ ऑर्गन मस्त सुरावटी काढत होता, मग थोडी शेकोटीची आणि शेकोटी करणाऱ्या लोकांची फोटोग्राफी झाली आणि एक अतिशय सुंदर फोटो मिळाला.
शेकोटी आणि आम्ही चौघे मक्या, अम्या, मी आणि नाशिक



रात्र मस्त चढली होती, शेकोटी - थंडी ह्या प्रकारात वाइनची उणीव चांगलीच जाणवत होती आणि सगळ्यांनी आपली हळहळ माना हलवत "हो ना यार....मजा आली असती...जाउ दे पुढच्या वेळी" व्यक्त केली. रात्र चढू लागली तसा गारठापण वाढू लागला, जरा वेळ चांदण्यांचा सडा पाहून, शेकोटी विजवून आम्ही तंबूत घुसलो, अम्याने मस्त गाणी लावली आणि गाणी ऐकता ऐकता झोपून गेलो. नेहेमीप्रमाणे जागा नवीन असल्याने मला झोप काही नीट लागली नाही, सकाळी जरा लवकरच उठलो, मक्यापण माझ्याबरोबर तंबूबाहेर आला. आम्ही मस्त शेकोटी पेटवली, तितक्यात सुर्यनारयण झपाझप रंग फ़ेकत आकाशात झेप घेउ लागले, अम्या आणि नाशिकला उठवले आणि सगळ्यांनी सुर्योदयाचे फोटोज काढले, डोंगराखालील गावे अजूनही झोपेत होती, त्यांच्या शेकोटीच्या रेषा हवेत विरत होत्या आणि पसरत होत्या, अगदी छान रम्य सकाळ वाटली. मग त्यानंतर चुलीवरच चहा करायचं ठरलं. अम्याने चुलीचा ताबा घेतला, मी आणि मक्या मिल्क पावडरपासून दुध बनवायच्या कामाला लागलो. अम्याने मस्त आले घालून, चहाला झक्कस उकळी आणली, त्यात दुध मिसळून परत एक उकळी आणली आणि फ़क्कड चहा तयार झाला, चहाला अमृततुल्य का म्हणतात हे अश्या ठिकाणीच कळू शकतं. एकचं ग्लास चहा पिता आला म्हणून हळहळ व्यक्त झाली पण पुढच्या वेळी अजून जास्त चहा करायचा असं ठरवून आम्ही तंबूची आवरा-आवरी सुरु केली.
नाशिक, मक्या, मी आणि अम्या..चूल आणि चहाची कढई
उगवता सुर्य आणि बाजूला पसरट केंजळगड
रायरेश्वाराच्या पठारावर जाणारी वाट
तंबू आवरला, सॅक पाठीवर टाकल्या आणि पायऱ्या चढून रायरेश्वराच्या पठारावर गेलो, तिथुन रायरेश्वराचे दर्शन घेतले. ह्याच रायरेश्वराला आपल्या रक्ताचा अभिषेक करून शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापण करायची शपथ घेतली होती. त्यामूळे आम्ही नकळतच अजूनच विनम्र झालो, शिवराय येथे आले होते ह्या कल्पनेने अगदी विरश्री संचारली गेली. त्या थोर शिवरायांना आणि त्यांना त्यांच्या उदात्त कार्यामधे यशस्वी करणाऱ्या रायरेश्वराला नमस्कार करून आम्ही मंदिरात बसलो. एका गावकऱ्या कडून ताक घेतले पण नेमके अतिशय आंबटढाण ताक पिउन उतरायला सुरुवात केली. परत कसरत करत बाईक उतरवल्या, सांधे खिळखिळे करत परंतु पुष्कळ सुखद अनुभव गाठीशी बांधून परतीच्या प्रवासाला लागलो.

बाकीचे फोटो येथे बघा:-

Labels: , , , ,

1 Comments:

At 1:09 PM, Blogger Amit Mitkar said...

Ek Number :).

 

Post a Comment

<< Home